Wednesday, 1 March 2017

उपकार

"काय गं श्वेता, काय झालं? अशी रडतेस काय?, काय म्हणाले सर? काही वेडंवाकडं बोलले का?" प्रीतीने प्रश्नांची सरबत्तीच सुरु केली. आणि मी दाटलेल्या कंठाने काहीही बोलूच शकत नव्हते. शिकवणी ते बसस्टॊप पूर्ण दहा मिनिटांच्या रस्त्यात अखंड डोळे वाहत होते. आणि गोंधळलेली, घाबरलेली प्रीती, माझी जिवलग मैत्रीण मला सावरायचा प्रयत्न करत होती, तेही मी का रडतेय याची काहीच कल्पना नसताना!

"बाबा, या विषयाला कॉलेजमध्ये शिकवायला चांगले शिक्षक नाहीत, तसे ते कोणत्याच विषयाला नाहीत. पण या विषयाचं जरा अवघड आहे. आणि पुढे करिअरसाठीही हाच विषय पक्का होणं आवश्यक आहे." - मी.
"किती असेल फी?" बाबा जरा चिंतेतच म्हणाले.
"पहिले तीन दिवस शिकवणीला जाऊन बसायचं आणि शिकवलेलं आवडलं तर पुढे सगळी फी दोन टप्प्यात भरून शिकवणी चालू ठेवायची. आठ हजार रुपयांची व्यवस्था दहा दिवसांत होईल का? तीन आणि पाच असे करून?" मी जरा चाचरतंच विचारलं.

आपल्याला ही फी परवडणारी नाही हे आधीच ठाऊक होतं तरीही धीर करून बाबांना विचारलं.
"बघतो जमतंय का". बाबाही विचारात पडले.
"नसेल जमत तर काहीच हरकत नाही बाबा, मी प्रीतीकडून समजून घेईन सगळं, आणि तीही मला नाही म्हणणार नाही. आतापर्यंत बऱ्याच वेळा अशी मदत केलीये तिने मला". बाबांना ओझं देऊन माझ्याच काळजावर धोंडा ठेवल्यासारखं वाटत होतं मला!
"जा बंड्या तू क्लासला, मी बघतो फीचं" बाबांनी माझं दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला.

मी त्याच दिवशी प्रीतीबरोबर पहिल्या दिवसाचा वर्ग पूर्ण केला. अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला होते. त्या विषयासाठी शिकवणी लावणं अगदी आवश्यकच होतं. आणि जडेजा सर तिथले सर्वात उत्तम शिक्षक होते. ते अतिशय कमर्शियल म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या शिकवणीला सगळी श्रीमंतांचीच मुलं दिसायची नेहमी. त्यांची फी देखील तशीच जास्त होती.  सुरुवातीचे तीन हजार तीन दिवसांनी भरले. ४५ दिवसांचा कोर्स होता. पुढची रक्कम सात दिवसात भरणं आवश्यक होतं.

"श्वेता, आज तुझा फी भरण्याचा शेवटचा दिवस आहे ना?" बाबांनी मी आठवण न करताच विचारलं. मी हो म्हणाले.
"मी तुमच्या सरांना आज दुपारी येऊन भेटून जाईन" - बाबा
"म्हणजे तुम्ही दुपारी माझी फी भरणार का?" - मी
"हो, दुपारपर्यंत होईल काहीतरी."
खरंच पैशांची व्यवस्था झालीये, की बाबा मला उगीच धीर देत आहेत? माझं मलाच कळेना.

संध्याकाळी शिकवणीला जायला निघालो आणि प्रीतीने माझी अस्वस्थता ओळखली. तिच्यापासून काहीच लपून नव्हतं.
"श्वेता काळजी नको करूस, उद्यापासून तुला नाही जमलं तरी कॉलेजमध्ये अर्धा तास जास्त थांबून सरांनी शिकवलेलं मला समजेल तसं तुला सांगत जाईन मी, सरांसारखं नक्कीच जमणार नाही. पण तुझं तरी कमीत कमी नुकसान होईल गं." मी खरंच इतकी भाग्यवान होते, प्रीतीसारखी मला समजून घेणारी, माझ्यासाठी तळमळ असणारी मैत्रीण मला मिळाली होती. नाहीतर स्वत:च्या घरचं सगळं छान असेल तर इतरांच्या गरिबीची खिल्लीच उडवताना सगळे दिसतात हल्ली!

शिकवणी सुरु झाली, सरांनी फी शिल्लक असलेल्या मुलांची फी भरण्यासाठी नावं वाचायला घेतली. प्रत्येक नावागणिक पुढचं नाव माझंच असेल असं वाटत होतं, आणि कानांवर दुसरं नाव पडलं की यापुढचं तर नक्कीच असेल अशी खात्री वाटत होती. पण पूर्ण यादीत माझं नाव नव्हतं. प्रीती आणि मला दोघींनाही खूप आनंद झाला. त्या दिवशी वर्गात मी सगळ्यात जास्त उत्तरं दिली. वर्ग संपला आणि सगळे निघताना सरांचा आवाज आला,
"श्वेता, आप मुझे ऑफिस में मिलना". आम्ही दोघींनी एकमेकींकडे पाहिलं. प्रीती म्हणाली,
"तू ये बोलून, मी वाट बघते बाहेर, नंतर एकत्रच जाऊया".

ऑफिसमध्ये जाऊन पोहोचले, मनात खूप धाकधुक होती की सरांना काय बोलायचं असेल. थोडा वेळ वाट पाहीली. तेवढ्यात सर आले आणि म्हणाले,
"तुझे बाबा भेटले मला, तुझ्या फीच्या अडचणीबद्दल सांगितलं. तू आजिबात काळजी करू नकोस, शिकवणीच्या शेवटच्या दिवशी तुला फी भरायला जमली तरी चालेल. आणि समजा तेव्हाही नाही जमलं, तर जेव्हा तुला नोकरी लागेल तेव्हा तुझ्या पगारातून नंतर तू मला पैसे आणून दे." (ते हिंदीतच बोलत होते)
हे ऐकलं आणि त्यांचा चांगुलपणा पाहून मला दाटून आलं, त्याच दाटलेल्या आवाजात त्यांना फक्त धन्यवाद दिले, अजून जास्तीचं काही बोलताच आलं नाही मला. आणि ऑफिसमधून बाहेर पडल्याक्षणी डोळ्यातून घळाघळा पाणी वाहायला लागलं.

Friday, 3 February 2017

धडा

आमची ओळख हॉस्टेलमध्ये पहिल्या दिवशी झाली. मला रूम मिळाली होती. मिळालेल्या रूममध्ये माझं सामान घेऊन मी नुकतीच पोहोचले होते. पाच मिनिटं झाली असतील आणि बाबांबरोबर एक गृहस्थ आणि त्यांच्यामागून एक मुलगी चालत येताना दिसले. ती माझी रूममेट होती. पहिल्या दिवशी रूमवर आम्ही दोघीच होतो. गप्पा मारता मारता आमच्यात लवकरच चांगली मैत्री झाली. नंतर रूममध्ये चार जणी झाल्या तरी हॉस्टेल ते घर हा प्रवासही एकत्रच असल्याने आमची जास्तच जवळीक झाली. ती मैत्रीण म्हणून खरंच खूप चांगली होती. नेहमी मदत करणारी! शिवाय एक वेगळाच आत्मविश्वास होता तिच्यात. तशी अभ्यासात मी तिच्यापेक्षा हुशार होते, पण कॉलेजात गेल्यावर अभ्यासच सर्व काही नसतो. वागणं, बोलणं, दिसणं या गोष्टीच जास्त परिणामकारक असतात. तिचा माझ्यावर पूर्ण प्रभाव पडला आणि मी ती म्हणेल तसं वागू लागले.

काही व्यक्तींशी तिचं फारसं पटत नसे. विशेषतः जे तिला डॉमिनेट करू पाहत असतील अशा लोकांशी. हॉस्टेलचे काही नियम होते आणि ते पाळले जातात की नाही हे पाहणं तिथल्या रेक्टरचं काम होतं. आता गावातलं कॉलेज असल्याने आणि रिझर्वेशन आणि वशिल्याने नेमणूक झाल्याने आमच्या रेक्टरचे काही स्वत:चेच नियम होते. जसं की त्या सकाळी कधीच वेळेत ऑफिसमध्ये यायच्या नाहीत इत्यादी. एकदा आम्हाला खरेदीला जाण्यासाठी गेटपास हवा होता आणि या बाई नेमक्या हजर नव्हत्या. त्या नियमाने वागत नाहीत म्हणून तिला त्यांचा राग यायचा आणि आम्हाला सूट देण्याच्या बाबतीत त्या होस्टेलचे सगळे नियम पाळत होत्या. त्यांच्या काही लाडक्या मुलींना महिन्यातून दोनपेक्षा जास्त गेटपास देणे असे प्रकार व्हायचे. ती मला प्रत्येक वेळी त्यांच्याबद्दल भडकावून लावायची.

वर्ष संपत आलं आणि आम्ही होस्टेलवर न राहता बाहेर रूम घेऊन राहू असं आमचं ठरलं. पुढच्या वर्षांना क्लासेस लावणं गरजेचं होतं आणि हॉस्टेलमध्ये राहून बाहेरचे क्लासेस अटेंड करणं शक्य नव्हतं. त्या वर्षाचा शेवटचा गेटपास आम्हाला हवा होता आणि रेक्टरची आणि आमची काहीतरी कुरबुर झाली. त्या भरात ती त्यांच्याबद्दल जे भडकवायची ते आठवून मी त्यांना बरंच काही बोलले. एरवी शांत असणारी मी अचानक असं काही बोलल्याने त्यांनाही वाईट वाटलं, पण परिणाम व्हायचा तो झाला. सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला खास आमच्या पालकांना यावं लागलं. अजूनही आपण काही चूक केलंय हे माझ्या गावी नव्हतं.

_____________________________________________

नंतर रूमवर राहू लागलो. फ्लॅटचे मालक आमच्याच जातीचे होते आणि चांगली माणसं होती ती. त्यांच्याकडे एक लहान मुलगी होती दोन वर्षांची तिचा मला आणि माझा तिला चांगलाच लळा लागला. काकूंना बाहेर काही काम असेल तर त्या तिला माझ्याकडे सोपवून जायच्या. त्या घरात नसतील आणि पाणी यायची वेळ असेल तर आम्ही त्यांचं पाणी भरून ठेवायचो. त्याही चांगलं काही खायला केलं की आम्हाला द्यायच्या, टीव्ही पाहायला बोलायावच्या. नंतर नंतर तर आम्ही आमची रूम सोडून त्यांच्याच घरी जास्त असायचो. त्यांच्या मोठ्या मुलाचा अभ्यास घेणे, त्याचे प्रोजेक्ट करून देणे ही कामंही मी करत होते. घरचे भेटायला आल्यावर त्या माझं खूप कौतुक करायच्या त्यांच्यासमोर.

त्यांचे काही नियम होते की इस्त्री वगैरे अशा गोष्टींसाठी लाईट जाळायची नाही. लाईट बिल ते स्वत: आणि आम्ही चार भाडेकरू असं वाटून घ्यायचो. आम्ही त्यांच्या समोरच राहत असल्याने आम्ही चोरून काही इलेक्ट्रिक वस्तू वापरणं शक्य नव्हतं. पण वरच्या मजल्यावरच्या मुली सगळ्या वस्तू वापरायच्या. हे आम्हाला बरंच उशिरा समजलं आणि तिची परत माझ्या मनावर कब्जा करायला सुरुवात झाली. आपण बिलात वाटा देतो आणि वरच्या मुलीच लाईट जाळतात. आपणही रात्री अभ्यास करायचा आणि जास्त वेळ लाईट जाळायची असं ठरलं. तेव्हा चूक-बरोबर काही कळायचं नाही मला. अजूनही कळतं का माहीत नाही, पण जुन्या चुका नक्कीच लक्षात आहेत.

कॉलेजचं ते शेवटचं वर्ष होतं. हॉस्टेल सोडल्यापासून आम्ही गुण्या-गोविंदाने तिथे राहीलो होतो. आणि असंच एक दिवस रात्री उशिरा लाईट चालू असताना मालकांनी फटीतून पाहण्याच्या प्रयत्न केला आणि आम्हाला त्यांची चाहूल लागली. तिने आमच्यात बरीच बडबड केली, मुलींच्या रूममध्ये पुरुषाने असं चोरून पाहावं का वगैरे. तसं तिचं म्हणणं चूक नव्हतं पण ते तसे नाहीत हे आम्हाला माहीती होतं. आणि शेवटी त्या कारणाने आमचं घरमालकांशी भांडण झालं. तिने ठिणगी टाकली आणि मी आग पेटवण्याचं काम केलं. रागाच्या भरात जुनं सगळं वागणं विसरून त्यांना अद्वातद्वा बोलले. रेक्टरप्रमाणे त्यांनाही धक्का बसला. तिच्याबद्दल त्यांना फार काही वाटलं नसेल पण ज्याच्याकडून अशा वागण्याची अपेक्षा नसते त्याने ते केलं की जास्त वाईट वाटतं, त्यामुळे माझ्याशीच त्यांची जास्त अढी बसली. घरचे आम्हाला न्यायला आल्यावर त्यांनी समजूत घालायचा प्रयत्न केला पण मी बोललेच असं होते की त्याचा आता काही परिणाम होणार नव्हता. काकूंच्या पाया पडताना डोळ्यांत पाणी आलं. मला फार वाटत होतं, त्यांना कळावं की मी त्यांना जे बोलले ते खरं नव्हतं, आत्ता डोळ्यांत आलेलं पाणी खरं आहे. पण तसं काही झालं नाही.

_____________________________________________

ते गाव सोडलं, परत घरी आले, लवकरच चांगली नोकरी मिळाली. आणि योगायोगाने तीही काही वर्षांनी माझ्याच कंपनीत नोकरीला लागली. इथे माझं चांगलं रेप्युटेशन होतं. ती कामाच्या बाबतीत ठीकठाक होती. काही वर्षं तिनेही व्यवस्थित काम केलं. आम्ही वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर होतो त्यामुळे कामाच्या बाबतीत फार संबंध यायचा नाही, शिवाय चांगली मैत्रीण एकाच कंपनीत त्यामुळे भावनिक आधार होता. पण हे सुख फार काळ टिकलं नाही. एक दिवस आम्ही दोघी एकाच प्रोजेक्टवर आलो. मी तिला सिनियर होते आणि बॉसला माझ्या कामाची पद्धत आवडत होती, तर ती सामान्यच आहे असं वाटत होतं. इतके दिवस ती फार महत्त्वाच्या नसलेल्या प्रोजेक्टसवर काम करत असल्याने तिचं स्किल कोणाला कळण्याचा फार प्रश्न आला नव्हता. पण आता बॉस तिच्या कामावर फारसा खुश नव्हता.

बॉसने तिला २-३ वेळा मीटिंग्समध्ये तिच्या चुका दाखवून झाल्या ज्या तिच्या मते चुका नसून साध्याच गोष्टी होत्या आणि बॉस त्याचा उगीच इश्यू करत होता. पुन्हा आम्ही दोघी एकत्र असताना तिची बॉसबद्दल माझ्या मागे भुणभुण चालू झाली. मग ते माणूस म्हणूनच कसे चांगले नाहीत इथपर्यंत तिचं बोलून झालं. मी माझ्या परीने बॉससमोर तिची बाजू घेण्याचा प्रयत्न करायचे पण बॉसने मला एक दिवस स्पष्ट सांगितलं की ती तुझी मैत्रीण आहे म्हणून तू तिची बाजू घेऊ नकोस. तिसऱ्यांदा पुन्हा तशीच परिस्थिती आली होती जी यापूर्वी दोनदा येऊन गेली. पण आता मला तिची बाजू घेऊन भांडणं शक्यच नव्हतं. एक चांगल्या पगाराचा आणि चांगलं रेप्युटेशन असलेला जॉब मी सोडूच शकत नव्हते. या जॉबवरच माझ्या कुटुंबाची गुजराण चालू होती. तिचा नवरा कमवायला भक्कम होता. ती घरी बसली असती तरी तिला काही फरक पडत नव्हता. माझा जॉब अशा कारणाने गेला तर मात्र मला दुसरी नोकरी मिळणंही कठीण होऊन बसलं असतं.

आणि पहिल्यांदा माझं मन शहाण्यासारखं वागलं. बॉसबरोबर तिला इश्यूज होते, मला नाही हे मी तिथे आधीपासून असल्याने मला कळालं होतं. हॉस्टेल आणि फ्लॅटवर आम्ही एकत्रच गेलेलो असल्याने मी तिथे तिच्या नजरेनेच सगळ्यांना बघत होते. पण इथे माझी आधीच सगळ्यांबद्दलची मतं तयार झालेली होती आणि ती चुकीची नाहीत याची मला खात्री होती. त्यामुळे तिने प्रयत्न करूनही मी बॉसबरोबर तिच्यासाठी मुळीच भांडले नाही. तिचा प्रश्न तिला एकटीलाच हाताळू दिला, आणि ती इथूनही भांडून निघून गेली. इथे कोणी तिच्याबद्दल चांगलं बोलत नाही आणि तिला दुसरी नोकरी मिळणं शक्य नाही.

तिच्या नवऱ्याचं त्याच्याच घरच्यांशी पटेनासं झालंय असं समजलं मध्यंतरी! आणि त्याचा स्रोत काय असावा याची कल्पनाही आली. पण ती माझी चांगली मैत्रीण आहे. मुद्दाम नसेल करत ती असं पण मला मात्र आयुष्यभराचा धडा मिळालाय! आता कोणी कितीही प्रयत्न केला तरी मी कोणाच्या प्रभावाखाली येत नाही.

Wednesday, 25 January 2017

कबुली

आधी ठरवलं होतं की समजा आपण ब्लॉग वगैरे तयार केला तर त्यावर रोज लिहियचं.
पण खरंच निवांत वेळ मिळाल्याशिवाय काही लिहिणं किती अवघड आहे हे चार दिवसातच समजलं.
इतके दिवस मी चांगले ब्लॉग्स नुसतेच वाचत होते आणि मनात यायचं हे लोक इतकं छान लिहू शकतात तर वारंवार का लिहीत नसावेत?
कोणाच्या ब्लॉगवर पूर्वी दर आठवड्याला अपडेट्स असायचे ते कोणाचे महिन्यावर तर कोणाचे वर्षावर गेलेले.
कोणाचा ब्लॉग २ वर्षांपूर्वी बंद पडलेला तर कोणाचा चार!
पण आता त्याचं उत्तर मिळालंय.
मला सहजच लिहायचं असूनही निवांत बसल्याशिवाय लिहावंसं वाटत नाही तर छान लिहिणाऱ्यांना तर अजून वातावरण निर्मिती लागत असेल ना!
डोक्यात दुसरेच काही विचार चालले असतील किंवा काही डेडलाईन असेल तर खरंच नाही जमत बुवा लिहायला.
आपली प्रांजळ कबुली!
आणि हो छान छान लिहिणाऱ्यांनी नक्की वेळात वेळ काढत जा!