Thursday 25 January 2018

अस्वस्थ आणि अव्यक्त

नेहमी वाटतं, ज्यांच्यामध्ये काही ना काही कला असते ते लोक किती नशीबवान असतात. स्वत:च्या दु:खाला त्यांना वाट मोकळी करून देता येते, आनंद साजरा करता येतो. कोणी दर्दभऱ्या आवाजात गाऊ शकतो तर कोणी त्या दु:खाला कॅनव्हासवर उतरवून आणतो, कोणी श्रेष्ठ साहित्यकृती जन्माला घालतो तर कोणी एखादी सुरावट रचतो. पण माझ्यासारख्या सामान्य लोकांनी काय करावं?
 
ना मी गायक, ना कवी, ना चित्रकार, ना कथाकार, ना कीर्तनकार! कोणतीच कला अवगत नसेल तर व्यक्त व्हावं कसं? अस्वस्थतेला बाहेर काढावं कसं? असा खूप प्रश्न पडायचा आणि एक दिवस किशोर, जगजीत ऐकता ऐकता आपसूकच उत्तर सापडलं, हे लोक व्यक्त झाले आहेत ते आपल्यासाठीच तर झाले आहेत.
 
आपल्याला कलेतून व्यक्त होता येत नाही तर त्यांची कला फक्त अनुभवावी! जितकं ऐकता येईल तितकं ऐकावं, जितकं वाचता येईल तितकं वाचावं, जितकं रसग्रहण करता येईल तितकं करावं प्रत्येक गोष्टीचं, आनंदातही अन दुःखातही! कुठेना कुठे संदर्भ जुळत जातात आणि समाधान; शांतता मिळत जाते. 
 
कला म्हणजे देवत्वाचा अंशच! तो सगळ्यांनाच कसा मिळेल? भले देवाने आपल्याला कोणती कला दिली नसेल पण रसिकता तर दिलीये ना? प्रत्येक गोष्टीची अनुभूती घेता येते त्याबद्दलच तुझे आभार देवा, ज्यांना तू हेही दिलं नाहीस त्यांनी काय करावं?

Wednesday 24 January 2018

अंतर

तू गेल्यावर रोज येते मी ठरलेल्या ठिकाणी.

आपल्यातली अंतरं विसरून जाते! समोर दिसतं ते सगळंच भव्य! 
अथांग समुद्र, नजरेत न सामावणारं क्षितिज, अस्ताला जाऊनही अफाट रक्तिमा पसरवणारा सूर्य, बेभान सुटणारा वारा!

या सगळ्यापुढे आपण कोण य:किंश्चित प्राणी? पण तुझ्यात सगळं झुगारण्याची हिंमत नाही, कळून चुकलंय मला!

रोज पाहते तू गेल्यावर मागे उरलेल्या पाऊलखुणा. बराच प्रयत्न करते मी माझी पावलं त्यात बसवून चालण्याचा!
पण दोन पावलातलं अंतर तुझ्यापेक्षा कमीच पडतं, आणि माझे पुन्हा प्रयत्न सुरु होतात तुझ्याशी समाजमान्य बरोबरी करण्याचे!

आज का आला नाहीस? काळजी? हुरहूर? नक्की काय? काहीच क्षण.... आणि छान वाटतंय आज कितीतरी युगांनी वाळूत तुझी पावलं येताना पाहताना!


Wednesday 1 March 2017

उपकार

"काय गं श्वेता, काय झालं? अशी रडतेस काय?, काय म्हणाले सर? काही वेडंवाकडं बोलले का?" प्रीतीने प्रश्नांची सरबत्तीच सुरु केली. आणि मी दाटलेल्या कंठाने काहीही बोलूच शकत नव्हते. शिकवणी ते बसस्टॊप पूर्ण दहा मिनिटांच्या रस्त्यात अखंड डोळे वाहत होते. आणि गोंधळलेली, घाबरलेली प्रीती, माझी जिवलग मैत्रीण मला सावरायचा प्रयत्न करत होती, तेही मी का रडतेय याची काहीच कल्पना नसताना!

"बाबा, या विषयाला कॉलेजमध्ये शिकवायला चांगले शिक्षक नाहीत, तसे ते कोणत्याच विषयाला नाहीत. पण या विषयाचं जरा अवघड आहे. आणि पुढे करिअरसाठीही हाच विषय पक्का होणं आवश्यक आहे." - मी.
"किती असेल फी?" बाबा जरा चिंतेतच म्हणाले.
"पहिले तीन दिवस शिकवणीला जाऊन बसायचं आणि शिकवलेलं आवडलं तर पुढे सगळी फी दोन टप्प्यात भरून शिकवणी चालू ठेवायची. आठ हजार रुपयांची व्यवस्था दहा दिवसांत होईल का? तीन आणि पाच असे करून?" मी जरा चाचरतंच विचारलं.

आपल्याला ही फी परवडणारी नाही हे आधीच ठाऊक होतं तरीही धीर करून बाबांना विचारलं.
"बघतो जमतंय का". बाबाही विचारात पडले.
"नसेल जमत तर काहीच हरकत नाही बाबा, मी प्रीतीकडून समजून घेईन सगळं, आणि तीही मला नाही म्हणणार नाही. आतापर्यंत बऱ्याच वेळा अशी मदत केलीये तिने मला". बाबांना ओझं देऊन माझ्याच काळजावर धोंडा ठेवल्यासारखं वाटत होतं मला!
"जा बंड्या तू क्लासला, मी बघतो फीचं" बाबांनी माझं दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला.

मी त्याच दिवशी प्रीतीबरोबर पहिल्या दिवसाचा वर्ग पूर्ण केला. अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला होते. त्या विषयासाठी शिकवणी लावणं अगदी आवश्यकच होतं. आणि जडेजा सर तिथले सर्वात उत्तम शिक्षक होते. ते अतिशय कमर्शियल म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या शिकवणीला सगळी श्रीमंतांचीच मुलं दिसायची नेहमी. त्यांची फी देखील तशीच जास्त होती.  सुरुवातीचे तीन हजार तीन दिवसांनी भरले. ४५ दिवसांचा कोर्स होता. पुढची रक्कम सात दिवसात भरणं आवश्यक होतं.

"श्वेता, आज तुझा फी भरण्याचा शेवटचा दिवस आहे ना?" बाबांनी मी आठवण न करताच विचारलं. मी हो म्हणाले.
"मी तुमच्या सरांना आज दुपारी येऊन भेटून जाईन" - बाबा
"म्हणजे तुम्ही दुपारी माझी फी भरणार का?" - मी
"हो, दुपारपर्यंत होईल काहीतरी."
खरंच पैशांची व्यवस्था झालीये, की बाबा मला उगीच धीर देत आहेत? माझं मलाच कळेना.

संध्याकाळी शिकवणीला जायला निघालो आणि प्रीतीने माझी अस्वस्थता ओळखली. तिच्यापासून काहीच लपून नव्हतं.
"श्वेता काळजी नको करूस, उद्यापासून तुला नाही जमलं तरी कॉलेजमध्ये अर्धा तास जास्त थांबून सरांनी शिकवलेलं मला समजेल तसं तुला सांगत जाईन मी, सरांसारखं नक्कीच जमणार नाही. पण तुझं तरी कमीत कमी नुकसान होईल गं." मी खरंच इतकी भाग्यवान होते, प्रीतीसारखी मला समजून घेणारी, माझ्यासाठी तळमळ असणारी मैत्रीण मला मिळाली होती. नाहीतर स्वत:च्या घरचं सगळं छान असेल तर इतरांच्या गरिबीची खिल्लीच उडवताना सगळे दिसतात हल्ली!

शिकवणी सुरु झाली, सरांनी फी शिल्लक असलेल्या मुलांची फी भरण्यासाठी नावं वाचायला घेतली. प्रत्येक नावागणिक पुढचं नाव माझंच असेल असं वाटत होतं, आणि कानांवर दुसरं नाव पडलं की यापुढचं तर नक्कीच असेल अशी खात्री वाटत होती. पण पूर्ण यादीत माझं नाव नव्हतं. प्रीती आणि मला दोघींनाही खूप आनंद झाला. त्या दिवशी वर्गात मी सगळ्यात जास्त उत्तरं दिली. वर्ग संपला आणि सगळे निघताना सरांचा आवाज आला,
"श्वेता, आप मुझे ऑफिस में मिलना". आम्ही दोघींनी एकमेकींकडे पाहिलं. प्रीती म्हणाली,
"तू ये बोलून, मी वाट बघते बाहेर, नंतर एकत्रच जाऊया".

ऑफिसमध्ये जाऊन पोहोचले, मनात खूप धाकधुक होती की सरांना काय बोलायचं असेल. थोडा वेळ वाट पाहीली. तेवढ्यात सर आले आणि म्हणाले,
"तुझे बाबा भेटले मला, तुझ्या फीच्या अडचणीबद्दल सांगितलं. तू आजिबात काळजी करू नकोस, शिकवणीच्या शेवटच्या दिवशी तुला फी भरायला जमली तरी चालेल. आणि समजा तेव्हाही नाही जमलं, तर जेव्हा तुला नोकरी लागेल तेव्हा तुझ्या पगारातून नंतर तू मला पैसे आणून दे." (ते हिंदीतच बोलत होते)
हे ऐकलं आणि त्यांचा चांगुलपणा पाहून मला दाटून आलं, त्याच दाटलेल्या आवाजात त्यांना फक्त धन्यवाद दिले, अजून जास्तीचं काही बोलताच आलं नाही मला. आणि ऑफिसमधून बाहेर पडल्याक्षणी डोळ्यातून घळाघळा पाणी वाहायला लागलं.